देवद्रव्य
Wikipedia कडून
मनुष्य जीवनाच्या प्रत्येक कार्यात प्रभूचा हात आणि साथ असते. ईश शक्तीनेच मनुष्य बोलतो, चालतो, झोपतो, खातो, पितो तसेच इतर सर्व क्रिया करतो. आपल्या प्रत्येक कार्यात अशा रीतीने भरून राहिलेला ईश्वर आपला खरा सखा,शेजारी किंवा भागीदार आहे. त्यामुळे कर्मामुळे मिळणाऱ्या फळातही त्याचा अधिकार आहे; हा सामान्य व्यवहार आहे. ह्या दृष्टीने पाहता आपणास होत असलेल्या विविध प्रकारच्या प्राप्ती मध्ये ईश्वराचाही भाग आहे. हा ईश्वराच्या चरणावर अर्पित केलेला ईश्वराचा भाग म्हणजेच देवद्रव्य होय.
प्राचीन भारतीय अर्थव्यवस्था अतिशय सुंदर होती. त्यात संपत्तीच्या संग्रहाला फारसे महत्त्व नव्हते. शास्त्रानुसार लोक भगवद्कार्यासाठी आणि दानासाठी द्रव्य वेगळे ठेवीत असत. परिणामतः आपोआप धनाचे विकेंद्रीकरण होत असे. धनसंचय मर्यादित राहात असे.
भगवंताचा भाग काढणे हे केवळ श्रीमंतांचेच काम नाही. भगवान श्रीमंत गरीब सर्वांचे जीवन चालवतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या कमाईतून यथोचित हिस्सा प्रभूचरणावर धरला पाहिजे.
देवद्रव्य भगवद्कार्यातच खर्च केले पाहिजे. ज्या कार्याने लोक ईश्वराभिमुख होतील, समाजात वडिलधाऱ्यांबद्दल पूज्यभाव निर्माण होईल, सात्विकता आणि सुसंस्कारिता वाढेल, लोकातील निस्तेजता आणि लाचारी दूर होईल, तेजस्विता निर्माण होईल, आत्मगौरव आणि ईशगौरव वाढवेल ते भगवत्कार्य होय. ह्या कार्यासाठीच लोक पै पैसा मंदिरात ठेवतात.
भगवंताच्या चरणावर अर्पण केलेल्या द्रव्याचा उपयोत भगवत्कार्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कार्यात होता कामा नये. आपण सर्व भावाने आणि श्रद्धेने भगवंताचा भाग त्याच्या चरणावर धरतो आणि म्हणूनच त्याच्या उपयोगाने भगवदविरोधी सैतान निर्माण न होता भगवद्प्रेमी मानव निर्माण व्हावा ह्यासाठी जाणीवपूर्वक सावध राहिलो तरच देवद्रव्याचा खरा सन्मान केला असे समजले जाईल.

