रघुनाथ धोंडो कर्वे

Wikipedia कडून

रघुनाथ धोंडो कर्वे हे महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे महर्षी कर्वे यांचे पुत्र होय.

स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी धरला होता. 'रघुनाथाची बखर' ही श्री. ज. जोशींची रघुनाथ धोंडो कर्वे या थोर व स्वाभाविकपणे उपेक्षिलेल्या एका सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरची एक वेधक कादंबरी. ध्यासपर्व हा अमोल पालेकरांनी त्यांच्यावर काढलेला एक अत्युत्तम चित्रपट. त्यात रघुनाथ धोंडो कर्वे यांची मध्यवर्ती भूमिका किशोर कदम ( कवी सौमित्र) ह्यांनी अत्यंत जीव ओतून केली आहे. त्यांच्या पत्‍नीची (मालतीबाई कर्वे)भूमिका सीमा विश्वास ह्या अक्षरशः जगल्या आहेत. बाकीची पात्रे ही जाणीवपूर्वक साहाय्यक व छोटी ठेवली आहेत. कुठेही मुख्य विषयापासून चित्रपट भरकटलेला नाही. अशा विषयावर ह्या आधुनिक युगात साधा चित्रपट काढताना/बघताना इतका त्रास/संकोचल्यासारखे होते तर त्या काळात तसे काम करताना काय काय सहन करावे लागले असेल हे जाणवते. हा समाज, एका स्त्रीने साधे शिक्षण घेण्या-देण्यावरून महात्मा फुले व सावित्रीबाईंना इतका त्रास देऊ शकतो तर ह्यांचा विषय त्यांना पचणे शक्यच नव्हते.
लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बर्‍याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला. एक सोपा उपाय त्यांना सापडला- संततिनियमन. फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये त्यांनी त्यासंदर्भात बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून नियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिर्‍हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बर्‍याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारताच्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी सध्या संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी(धोंडो केशव कर्वे) पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंगलर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. त्यामुळे जरी ते ती केस हरले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.
[1]

इतर भाषांमध्ये