पंचायतन पूजा
Wikipedia कडून
भारतीय संस्कृती सर्वग्राही तशीच सर्वसहिष्णु आहे. मानवाने ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार केल्यानंतर त्याने ईश्वराची कॊणत्या स्वरूपात पूजा करावी ह्यासाठी भारतीय संस्कृतीचा कोणताही आग्रह नाही. भगवंताची सर्वच रूपे सुंदर आणि मनोहारी आहेत. ज्याचे मन ज्या रूपात आकर्षित होते त्याने त्या रूपाची पूजा करावी.
विभिन्न उपास्य देवानां मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी शंकराचार्यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. ह्या पूजेनुसार समाजात गणपती, शिव, हरी (विष्णू), भास्कर आणि अंबा ह्या पाच देवांचे पूजन झाले पाहिजे. ह्या पाच देवतातून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. ह्या पद्धतीनुसार 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. त्याने व्यक्तीच्या भावनांना समाधान प्राप्त झाले आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला.
योग्य रीतीने समजून केली तर पंचायतन पूजा अतिशय शास्त्रीय आहे. गणपती, शिव, हरी (विष्णू), भास्कर आणि अंबा ह्यांचे पूजन म्हणजे बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्यांची उपासना. मानव जीवनाच्या विकासात ह्या पाच तत्त्वांची नितांत आवश्यकता आहे.
अशी श्रेष्ठ पंचायतन पूजा समाजात पुन्हा शास्त्रीय रीत्या सुरू झाली तर त्याने मानवाचे परम कल्याण साध्य होईल.

