चंद्रगुप्त मौर्य
Wikipedia कडून
|
इतिहासाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
चंद्रगुप्त मौर्य (राज्यकाल ई.स.पू. ३२२ ते ई.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.
सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून ख्रि.पू. ३२२ साली आर्य चाणक्य ऊर्फ़ कौंटिल्य (अर्थशास्त्र या देदीप्यमान ग्रंथाचा रचनाकार) याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.
अनुक्रमणिका |
[संपादन] जन्म
चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा मोर पाळणार्या टोळीत जन्माला आला व चाणक्यास विंध्य पर्वताच्या प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित चाणक्य जाणून होता.
[संपादन] राज्यकाल
चंद्रगुप्ताच्या जन्माबद्दल जरी एकमत नसले तरी त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल एकवाक्यता दिसते. नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या हेलन हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला. या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणी इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला. दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.
[संपादन] भौगोलिक सीमा
चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेशात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश, काबूल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, दख्खन (आधुनिक महाराष्ट्र) व मैसूर यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती अवाढव्य होते याचा अंदाज येतो.
[संपादन] राष्ट्रभाषा
संस्कृत व ग्रीक भाषा या भाषांना राष्ट्रभाषा म्हणून मान्यता होती व राजदरबारी संस्कॄतचाच वापर करण्यात येत असे. संस्कॄत भाषा येणे हेच सुशिक्षितपणाचे लक्षण मानण्यात येत असे. प्राकृत ही बोली भाषा म्हणून राज्यात वापरली जात असली तरी त्यास राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून सम्राट अशोकाच्या वेळी स्वीकारण्यात आले (ई.स.पू. २६९ ते ई.स.पू. २३२).
[संपादन] कायदा व सुव्यवस्था
कायदा व सुव्यवस्था ही चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीची खरी यशाची नांदी होती. राज्याचा राज्यकारभार संपूर्णपणे मध्यवर्ती होता व राजा हाच सर्वेसर्वा होता. नंद राजवटीखाली राज्यात बोकाळलेल्या गुन्हेगारीला व भ्रष्टाचाराला चंद्रगुप्ताने चाणक्याच्या सहाय्याने काही वर्षातच आवाक्यात आणले. चाणक्याच्या मदतीने उभारलेल्या उत्तम गुप्तचर यंत्रणेच्या जोरावर महसूल विभागातील भ्रष्टाचारास संपूर्णपणे आळा घालण्यात आला व थोड्याच दिवसात कठोर व पारदर्शक न्यायप्रणालीने चंद्रगुप्ताने आपल्या न्यायदानाबद्दल प्रजेचा विश्वास संपादन केला. "अमावास्येच्या रात्री देखील आर्य स्त्रिया तलम व रंगीबेरंगी वस्त्रे नेसून मौर्यांच्या शहरातून निवांतपणे फिरताना आढळतात" या मेगॅस्थेनिसच्या विधानावरून मौर्यांच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल कल्पना येते.
चंद्रगुप्ताचे गुप्तहेरखाते आणि सुरक्षाखाते समर्थ व सबळ असल्याचे सांगितले जाते. स्वत:च्या जिवाला अपाय होऊ नये यासाठी अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इत्यादींमध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.
[संपादन] समाज
राजाचा व राष्ट्राचा धर्म हिंदू होता. सर्व राजकीय धोरणे व न्यायप्रणाली ही चाणक्याच्या अर्थशास्त्रात सांगितलेल्या प्रथेप्रमाणे अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित होती, परंतु सर्वधर्मसमभाव होता. अनेक देशांतून मौर्यांचे ऐश्वर्य पाहण्यास व राज्यकारभाराचा अभ्यास करण्यास येणार्या प्रवाशांना व विद्वानांना मानाचे स्थान होते. सांस्कॄतिक आदानप्रदानास मुभा होती. मेगॅस्थेनिस चातुर्वर्ण पद्धतीचा उल्लेख करत नाही, तरी त्या काळचा समाज हा विविध समाजघटक करीत असलेल्या कामांनुसार विभागला असल्याचे वर्णन करतो. चाणक्याच्या लेखनातदेखील जन्मापेक्षा कर्माला जास्त महत्त्व दिलेले आढळ्ते. त्यामुळे मौर्यकालीन समाज हा विभाजित असला तरी आता ज्याप्रमाणे जातवाद माजला आहे तसा त्यावेळी नसावा असे वाटते.
[संपादन] संदर्भ
- अशोकचरित्र - वा. गो. आपटे.

