मूर्तिपूजा
Wikipedia कडून
मूर्तीपूजेची कल्पना ऋषींकडून मिळालेली अनुपम भेट आहे. मूर्तीला न मानणारा मनुष्य केवळ स्वतःचे मानसशास्त्राविषयीचे अज्ञान प्रदर्शित करतो.
मूर्तीपूजेची गरज चित्त एकाग्र करण्यासाठी आहे, ही गोष्ट स्पष्टपणे समजली तरच मूर्तीपूजेचे मानसशास्त्रीय महत्त्व ध्यानात येईल. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहता, माणसाचे मन कधी रिकामे राहात नाही, निर्गुण निराकारात ते एकाग्र होत नाही आणि एकाच वेळी दोन गोष्टींना पकडत नाही.
मन एकाग्र झाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही तसेच त्याची शक्ती फुलत नाही. म्हणून मनाला एकाग्र केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मन आकाराशिवाय स्थिर होत नाही. त्याला आलंबनाची (object) ची गरज असते. ज्याचे आलंबन देऊ त्याचा आकार, त्याचे गुणदोष मन धारण करते. जडाचे चिंतन करणारे मन जड बनते, स्त्रीचे चिंतन करणारे मन स्त्रैण बनते. त्याचप्रमाणे भगवदरूपात मन स्थिर करणारा माणूस दिव्य बनतो. म्हणून अन्य कोणाचे ध्यान न करता भगवंताचे ध्यान करणे हिताचे आहे. मन दुसरया कोणत्या गोष्टीत गेले तर भगवंताची मूर्ती मनःपटलावरून निघून जाईल, कारण मन एकाच वेळी दोन ठिकाणी राहात नाही.
मनुष्याला तारण्याची शक्ती मूर्तीत नाही तर तिच्या मागे असलेल्या भावनेत आहे. परब्रह्म परमेश्वर ह्या आकारात आहे, 'ह्या मूर्तीत आहे' ह्या भावनेला महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते आणि त्या क्षणापासून ती मूर्ती, मूर्ती न राहता परमेश्वर बनते.
आपल्या मनाचा फार मोठा भाग अज्ञात आहे. ज्ञात असा मनाचा लहानसा तुकडा देखील आपण ताब्यात ठेवू शकत नाही तर विशाल अशा अज्ञात मनाला कसे काय ताब्यात ठेवणार? अग्नीतून काढलेला कोळसा पुन्हा अग्नीत टाकताच जसा लाल होतो तसे प्रभूकडून मिळालेले मन पुन्हा प्रभुमध्ये केंद्रित होईल तरच ते विशुद्ध बनेल. भगवंत गीतेत देखिल हेच सांगतात की, 'मय्यावेश्य मनो ये माम्', 'तुझे मन माझ्यात एकाग्र कर, मला अर्पण कर'.

